महाराष्ट्र टाईम्स (9 Jul 2012, 0000 hrs IST ), नाशिक येथे प्रकाशित लेख
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देणारा काळ...
स्पर्धा परीक्षांबद्दलची
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली भिती आता हळूहळू कमी होत आहे. या
परीक्षांमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यशस्वी
होण्याचे प्रमाण अधिक असून येणारा काळ हा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या
बुध्दिमत्तेला वाव देणारा ठरणार आहे ,
असे मत मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
स्टडी सर्कलमार्फत स्पर्धा
परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
करण्यात आले होते. स्वत:बद्दल असलेला न्यूनगंड बाजूला ठेवून संपूर्ण
तयारीनिशी या स्पर्धेमध्ये उतरण्याचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना
दिला. तसेच अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करणे आवश्यक
असल्याचे ते यावेळी म्हणाले. स्टडी सर्कलचे संचालक आनंद पाटील यांनीही
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जून महिन्यामध्ये झालेल्या दोन
स्पर्धा परीक्षांची काठीण्यपातळी अधिक का होती हे त्यांनी यावेळी
विद्यार्थ्यांना सांगितले. इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये
विद्यार्थ्यांना मुलाखतीमध्येच नाही तर पूर्व परीक्षेपासून पारखून घेतले
जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोणत्याही अभ्यास साहित्यावर
अवलंबून अभ्यासामध्ये दिरंगाई न करता उपलब्ध साहित्याचा पुरेपूर अभ्यास
करा असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. स्पर्धा परीक्षांमध्ये यश
मिळवलेल्या तसेच विविध पदांसाठी निवड झालेल्या जवळपास १०० विद्यार्थ्यांचा
यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अन्य अधिकाऱ्यांनीही
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
१६ फेब्रुवारीला चौथे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन
ग्लोबल एज्युकेशन रिसर्च
ट्रस्टमार्फत नाशिकमध्ये चौथे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन १६ आणि १७
फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्र , पुस्तक प्रदर्शन , अनुभव कथन , ग्रंथ दिंडी ,
प्रकट मुलाखती तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कवी संमेलन या उपक्रमांचा
संमेलनामध्ये समावेश असणार आहे. स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या
राज्यभरातील विद्यार्थ्यांना यामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.
संमेलन अध्यक्षपदी शेखर गायकवाड
नाशिकमध्ये होणाऱ्या या
संमेलनाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव शेखर गायकवाड असणार
आहेत. स्पर्धा परीक्षांचे पहिले साहित्य संमेलन २०१० साली पुण्याला भरले
होते , त्याच्या
अध्यक्षस्थानी विश्वास पाटील होते. दुसरे औरंगाबादला भरवण्यात आले होते.
त्याचे अध्यक्षपद ज्ञानेश्वर मुळे यांनी भूषविले तर नागपूरला झालेल्या
तिसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख होते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14752838.cms